अहमदनगर : ‘सावेडी उपनगर ज्या वेगाने वाढत आहे, त्यामानाने येथील नागरिकांना मिळणार्या सुविधा कमी आहेत. यासाठीच सावेडीच्या विकासासाठी परिवर्तन करून सावेडी उपनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व नगरसेवक निवडून द्या, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
‘भाजप’चे प्रभाग सहाचे उमेदवार आणि स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारस्कर, डॉ. आरती बुगे, वंदना ताठे यांच्या प्रचाराचा नारळ खासदार गांधी यांच्या हस्ते सावेडी गावठाण येथे मारुती मंदिरात वाढविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष विकासाच्या मुद्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. ही विकासाची गंगा नगरमध्ये वाहण्यासाठी महापालिकेत ‘भाजप’ची सत्ता येणे आवश्यक आहे. आता जनतेनेच निर्णय घेऊन विकासासाठी सक्षम असणार्या ‘भाजप’चे उमेदवारांना निवडून द्यावे.’
या वेळी सावेडी गावठाण परिसरातून हजारो नागरिकांच्या उपस्थित प्रचारफेरी काढण्यात आली. यात ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अॅड. अभय आगरकर, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, मोहन मानधना, बाळासाहेब वाकळे, विठ्ठल बारस्कर, दिलीप बारस्कर, अशोक वाकळे, जगन्नाथ बारस्कर, राजू बारस्कर, भानुदास बारस्कर, आशा कराळे, राजेंद्र वाकळे, गजानन वाकळे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.